मुंबई : भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना केले व एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. भाजपची पुढील रणनीती गुरुवारी सांगितली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत फडणवीस आणि शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे चर्चा करुन निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  उध्दव ठाकरे यांचा राजीनामा ही आनंद साजरा करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे जल्लोष करताना आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन पाटील यांनी केले.  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, राज्याला लागलेले ग्रहण संपले, असे मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.