मुंबईत शासकीय रुग्णालयातील पहिलीच शस्त्रक्रिया

मुंबई : एक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दोन्ही हात काढून या हातांचे दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबईतील केईएम रुग्णालयात हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच झाली असून शासकीय रुग्णालयात प्रथमच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

वोक्हार्ट रुग्णालयातील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी दान करण्याची परवानगी दिली. त्यामुळे तातडीने याच्या प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू केली गेली. विभागीय अवयवदान विभागाकडे हात प्रत्यारोपणासाठी पाच व्यक्ती प्रतीक्षेत होत्या. मध्य प्रदेशमधील २४ वर्षीय तरुणाला हे हात जोडण्याचा निर्णय घेतला गेला आणि ही शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात बुधवारी रात्री पार पडली.

‘मध्य प्रदेशमधील या तरुणाचे दोन्ही हात अपघातात गेले होते. प्रत्यारोपणासाठी त्याला तातडीने तेथून मुंबईत बोलावण्यात आले. मृत व्यक्तीचे हात शरीरापासून योग्यरीतीने वेगळे करण्यासाठीही रुग्णालयातील पथक खासगी रुग्णालयात गेले होते. बुधवारी रात्री सुरू झालेली ही शस्त्रक्रिया १४ तास चालली. गुरुवारी सकाळी ती पूर्ण झाली. तुटलेला हात जोडण्यापेक्षा दुसऱ्या शरीराचे हात जोडणे अधिक आव्हानात्मक असते. यात हाडांपासून नसांपर्यंत सर्वच भाग काळजीपूर्वक जोडावे लागतात. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते. रुग्णालयातील अस्थिरोग विभागासह प्लास्टिक सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली असून रुग्णाला १४ तास बेशुद्ध अवस्थेत ठेवण्यासाठी भूलतज्ज्ञांची मोठी जबाबदारी होती. शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी हात पूर्णपणे कार्यरत होण्यास जवळपास एक वर्षांचा कालावधी लागणार आहे,’ असे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. मुंबईत या आधी मोनिका मोरे हिच्यावर ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली गेली.

अधिक काळजी घेणे गरजेचे

शस्त्रक्रिया झाल्यावर रक्तप्रवाह सुरू झाला तरी तो विशिष्ट दाबाने होतो का याचे परीक्षण रुग्णाची नखे पाहून केले जाते. शस्त्रक्रिया होऊन २४ तास उटलून गेले असले तरी  करोनाकाळात कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी पुढील काही दिवस जोखमीचे असल्यामुळे रुग्णाची काळजी अधिक चांगल्या रीतीने घेणे गरजेचे आहे. वारंवार तपासणी, फिजियोथेरपी यासाठी रुग्णाला किमान सहा महिने तरी मुंबईतच राहावे लागणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात २२ दात्यांकडून अवयवदान

करोनाकाळात अवयवदान आणि प्रत्यारोपण यांचे प्रमाण कमी झाले आहे.  इतर आरोग्य सेवांप्रमाणे याच्यावरही करोनामुळे परिणाम झाला आहे. जानेवारी ते १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुंबईत २२ दात्यांचे ६१ अवयवदान करण्यात आले आहेत. यात मूत्रपिंड (२२), यकृत (२०), हृदय (५), फुप्फुस (३) आणि एका दात्याने दोन्ही हात दान केले आहेत, तर सहा नेत्रपटल आणि पाच जणांनी त्वचादान केली आहे.

३३२५ नागरिक मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत

एखादा अवयव निकामी झाल्यानंतर त्या जागी दुसऱ्या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यासाठी नोंदणी केली जाते. याची यादी तयार केली जात असून आवश्यकतेनुसार आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार प्राप्त झालेले अवयव प्रत्यारोपित केले जातात. मुंबईत सध्या ३३२५ रुग्ण हे मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या खालोखाल यकृत (७२८), लहान आतडे (७), स्वादुपिंड (१२), हृदय (२८), फुप्फुस (९), हृदय आणि फुप्फुस (६) आणि हात (५) या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी आहे.