मुंबई : हार्बर मार्गावरील चेंबूर – टिळकनगरदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना बुधवारी सकाळी २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या देहाचा काही भाग लोकलच्या चाकात अडकल्याने चेंबूर – टिळकनगरदरम्यान बराच वेळ लोकल उभी होती. लोकल मार्गस्थ झाली आणि मानखुर्द येथे पोहचताच तरुणाचे कपडे लोकलमध्ये अडकल्याचे लक्षात आले. त्यामुळे मानखुर्द येथे पुन्हा लोकल थांबली. या घटनेमुळे संपूर्ण हार्बर मार्गिका खोळंबली. परिणामी, अनेक लोकल रद्द कराव्या लागल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जानेवारी २०२१ ते मे २०२५ या कालावधीत एकूण १० हजार २३९ प्रवाशांचा रेल्वे प्रवासादरम्यान विविध कारणांमुळे मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. मध्य रेल्वेवरील ३,१५१ आणि पश्चिम रेल्वेवरील १,९७० प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे मार्गावर सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना होत असून प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी लिफ्ट, सरकते जिने, पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. तसेच, रेल्वेच्या दोन्ही दिशेला सुरक्षा जाळी आणि सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर वारंवार उद्घोषणा करून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.