कोकणात संततधार; विदर्भ-मराठवाडय़ात दोन दिवसांत जोरदार बरसणार
मुंबईसह ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्य़ांत पावसाचा जोर वाढला असून कोकणातील संततधार अशीच सुरूच राहणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्राकडे पाठ फिरवणारा पाऊस दोन दिवसांत पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे. विदर्भात आज तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात मंगळवारपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती असून रविवारी भारताच्या वायव्य भागात गुजरात व राजस्थानपर्यंत पाऊस पोहोचला आहे. सध्या देशात सर्वाधिक पाऊस कोकण किनारपट्टीवर पडत आहे. रविवारी सकाळच्या नोंदीनुसार दिवसातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या पहिल्या सहा क्रमांकांमध्ये कोकणपट्टीतील पाच ठिकाणांचा समावेश आहे. डहाणू येथे २५० मिमी, अलिबागला १८२ मिमी, हर्णेला १७४ मिमी, कुलाबा येथे १२२, भिरा येथे ११० तर सांताक्रूझ येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय उरण (१७४ मिमी), गुहागर (१७० मिमी), पालघर (१४६ मिमी), पेण (१४० मिमी), श्रीवर्धन व दापोली (१३० मिमी), रत्नागिरी व पनवेल (१२० मिमी), सांताक्रूझ (८५ मिमी) येथेही जोरदार सरी आल्या. मध्य भारत, पश्चिम व पूर्व किनारपट्टी व ईशान्येकडील राज्यांतही पावसाच्या जोरदार सरी येत आहेत.
मुंबईत ४६५ मिमी पाऊस
रविवारपर्यंत मुंबईतील सांताक्रूझ येथे ४६५ मिमी तर कुलाबा येथे ३८९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाची सध्याची स्थिती पाहता जून महिन्यातील ५२३ मिमी सरासरी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत असून एकूण पाणीसाठय़ात किंचित वाढ होऊन ९६ हजार ६६५ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.