बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्टय़ामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या बुधवारी ७ आणि गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी जोरदार पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज असून उद्या पूर्व—विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील. परंतु ८ तारखेला विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, ज्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दरम्यान औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यंतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मध्य—महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यंत ८ आणि ९ ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान उर्वरित मध्य—महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यंत ८ आणि ९ ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भात ९ ऑगस्टपासून तर मध्य—महाराष्ट्रात १० ऑगस्टपासून हवामानाची स्थिती सामान्य होईल. या दरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य—महाराष्ट्रातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
पावसामुळे एसटी सेवांवर परिणाम
राज्यातील काही भागांत पडलेल्या पावसामुळे एसटी सेवांवरही मोठा परिणाम झाला. कोल्हापूर व सांगलीत पूरस्थिती निर्माण झाल्याने एसटी सेवा पूर्णपणे ठप्पच झाली आहे. तर मुसळधार पाऊस व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही एसटी धावू शकल्या नाहीत. अहमदनगर, नाशिकमधील काही भागांतही तीच परिस्थीती होती. बुधवारीही या भागांत एसटी सेवा होण्याची शक्यता कमी आहे.