मुंबई : पुढील आठवडय़ात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार असून समुद्रात साडेचार मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत, तर बुधवारी सगळय़ात मोठी भरती येणार आहे. यादरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पावसाळय़ात समुद्राला मोठी भरती आल्यानंतर मुंबईला धोका निर्माण होतो. या काळात समुद्र खवळल्यानंतर काही वेळा साडेचार मीटरहून उंच लाटा उसळतात, तर याच काळात वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्यजल वाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखल भागात पाणी साचते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने पावसाळय़ातील भरती- ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार सोमवार, ३ जुलै ते शनिवार, ८ जुलैदरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे.