मुंबई : अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलला बुधवारी पहाटेच्या सुमारास “मुंबई को उडा देंगे” अशी धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. याप्रकरणी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अंधेरीतील आरिका हॉटेलचे उप सुरक्षा अधिकारी अपूर्व पारेख यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलच्या लँडलाईनवर अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून हिंदीतून “मुंबई को उडा देंगे” अशी धमकी दिली. दूरध्वनीवरून बोलणाऱ्या व्यक्तीने हॉटेलमध्येही बॉम्ब असल्याचा दावा केला. मुख्य नियंत्रण कक्षाने तात्काळ घटनेची माहिती सहार पोलिसांना दिली. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक हॉटेलच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले. गुन्हे शाखा व इतर अधिकाऱ्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कार्यप्रणालीनुसार कारवाई करून वरिष्ठांना माहिती दिली. तसेच हॉटेल परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली. संबंधित मोबाइल नंबरच्या आधारे दूऱध्वनी करणाऱ्याचा शोध सुरू आहे. हा खोडसाळपणा होता की वास्तविक धमकी, याचा तपास पोलीस करीत आहेत.

खोटी माहिती व धमक्यांमुळे पोलिसांवर ताण

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान ३०० हून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळा करता येत नाही. सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न केल्यानंतर धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांसाठी डोकेदुखी

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांची प्रकरणेही हाताळावी लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.