राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारच्या काळात राज्यात केलेल्या कामांवर निशाणा साधला. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. फडणवीस बनावट नोटांच्या धंद्याला प्रोत्साहन देत असून त्यांच्या इशाऱ्यावर मुंबईत खंडणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दाऊदचा जवळचा सहकारी रियाझ भाटी याला देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“२९ ऑक्टोबर रोजी रियाज भाटी सहार एअरपोर्टवर खोट्या पासपोर्टसह पकडला गेला. ज्याचे संबंध अंडरवर्ल्डसोबत होते. रियाज भाटी वारंवार तुमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतही रियाज भाटीने फोटो काढले. असं काय कारण होते की रियाज भाटी पंतप्रधानांतपर्यत पोहोचला. देवेंद्र फडणवीस तुम्ही गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले, बनवाट नोटांचे नेक्सस तुम्ही चालवले. रियाज भाटीच्या माध्यमातून वसुली केली केली,” असे मलिक म्हणाले.




“रियाझ भाटी दाऊदचा माणूस आहे. अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेला रियाज भाटी दोन पासपोर्टसह पकडला गेला तर दोन दिवसांत कसा सुटतो? त्याला पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा पास कसा मिळतो? देवेंद्र फडणवीसांचे संरक्षण त्याला होते. मी फोटोच्या बाबतीत नाही तर बोगस पासपोर्टच्या प्रकरणात त्याला कसे सोडण्यात आले याबाबत बोलत आहे. पंतप्रधांच्या कार्यक्रमात तपास केल्याशिवाय कोणाला जाण्याची परवानगी नसते. रियाज भाटीला या कार्यक्रमात जाण्याची परवानगी कोणी दिली हा माझा प्रश्न आहे,” असे नवाब मलिकांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार प्रहार केला आणि मलिकांच्या मुलाचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला. १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेल्या अंडरवर्ल्डच्या लोकांकडून नवाब मलिकांनी जमीन खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. नवाब मलिक यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली, असा सवाल त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक आणि त्याच्या कुटुंबावर दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या २००५ च्या बॉम्बस्फोटातील दोषी बादशाह खानचा ‘फ्रंट मॅन’ मोहम्मद सलीम पटेल यांच्याकडून २.८० एकरचा भूखंड खरेदी केल्याचा आरोप केला.