मुंबई : आयआयटी मुंबईच्या शैलेश जे. मेहता स्कुल ऑफ मॅनेजमेंटतर्फे राबवल्या जाणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता निकषांमध्ये आयआयटी मुंबईने बदल केले आहेत. आता तीन वर्षे अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होणारे किंवा दहापैकी ६.५ एवढा संचयी कामगिरी निर्देशांक (क्युम्युलेटिव्ह परफॉर्मन्स इंडेक्स) असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. मात्र त्यासाठी त्यांना एमबीए प्रवेशासाठीची ‘कॅट’ म्हणजेच कॉमन ॲडमिशन टेस्ट देणे बंधनकारक आहे.

आयआयटी मुंबईतील या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आधी चार वर्षांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र २०२५-२६ च्या एमबीएच्या बॅचसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवताना या निकषात बदल करण्याचा निर्णय गेल्या वर्षी झालेल्या आयआयटीच्या अधिसभेत घेण्यात आला. एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाखांमध्ये वैविध्य असेल, तर ते वर्गातही विविध कल्पनांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते. त्यामुळे आता तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा अभ्यासक्रम खुला झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, तेदेखील या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवू शकतात. मात्र, त्यांनी दिलेल्या शेवटच्या परीक्षेत त्यांनी किमान ६० टक्के गुण मिळवलेले असणे अनिवार्य आहे. एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही अट ५५ टक्क्यांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना देशपातळीवर एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली कॉमन ॲडमिशन टेस्ट उत्तीर्ण होणे आणि त्या परीक्षेत पात्रतेसाठीचे मार्ग मिळवणे आवश्यक आहे, असे आयआयटी मुंबईने जाहीर केले आहे.