मुंबई : आपल्या तीन चिमुकल्या मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलांच्या आजीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
चेतना पाटील (३२) आणि पंकज कुमार (४०) हे २०२० पासून अंधेरी येथे राहतात. चेतनाला पहिल्या पती पासून ७ वर्षांचा प्रियांक नावाचा मुलगा आहे तर पंकज कुमारपासून राघव (१) विवाणी (२) अशी दोन मुले आहेत. पंकज कुमार सावत्र मुलगा प्रियांक याला अमानुष मारहाण करीत होता. त्या मारहाणीची चित्रफित शेजाऱ्यांनी काढून चेतनाची आई पूनम परमार यांना दाखवली.
परमार यांनी समज दिल्यानंतर चेतना आणि पंकज कुमार मालाड येथे राहण्यास आले. मात्र सप्टेंबर २०२४ पासून हे दोघे आपल्या दोन्ही मुलांना मारहाण करू लागले. या दोघांकडून मुलांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. मुलांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा देखील आहेत. ही बाब मुलांची आजी पूनम परमार यांना समजताच त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मालवणी पोलिसांनी चेतना पाटील आणि पंकज कुमार यांच्याविरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील कलम ७५, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.