मुंबई – दिवसा रिक्षाचालक, डिलिव्हरी बॉय बनून घरांची रेकी करून रात्री चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीवर ४० हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपीमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उपनगरात रात्रीच्या वेळी बंद घरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. एका विशिष्ट पध्दतीने चोरी केली जात होती. ३० मे रोजी मालाडच्या नाजीर खान यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केलेल्या चोरांनी सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम लंपास केली होती. कुरार पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक तपास आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने कुरार पोलिसांनी चोरी करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला अटक केली आहे. अब्दुल अन्सारी उर्फ अप्पू खोटा (२९) या टोळीचा म्होरक्या आहेत. दिपाली भूल उर्फ दिपाली शर्मा (२५), सुरज जाधव (२९) आणि आकाश पवार (२५) या आपल्या ३ साथीदारांसह तो घरफोडी करत होता.
आऱोपी दिवसा रिक्षाचालक तसेच विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. महिला आरोपी देखील दिवसभर फिरून बंद घरांचा माग काढत होती. त्यामुळे या आरोपींवर कुणाला संशय येत नव्हता. रेकी केल्यानंतर रात्रीच्या वेळी ते घरफोडी करत होते. मागील आठवड्याभरात त्यांनी कुरार, मालाड, आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
या टोळीतील मुख्य आरोपी अब्दुल अन्सारी उर्फ अप्पू खोटा (२९) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे २२ मे रोजी तो तुरूंगातून जामिनावर सुटून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा चोरी करणे सुरू केले होते.
पोलीस उपायुक्त महेश चिमटे (परिमंडळ १२), समता नगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे, पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजव घोळवे, पोलीस निरीक्षक अविनाश नलावडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.