मुंबई : मुंबईतील एका नाल्यात सापडलेल्या अजगराच्या अंड्यांची अलीकडेच यशस्वी उष्मायन प्रक्रिया पूर्ण झाली असून जन्मलेल्या पिलांना आता नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आले.

मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामादरम्यान मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावरील एका नाल्यात नऊ फूट लांबीची मादी अजगर आणि २२ अंडी सापडली होती. संबंधितांनी याबाबत तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी आणि रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे (रॉ) पदाधिकारी तातडीने तेथे पोहोचले. यांनी मादी अजगर, तसेच अंडी ताब्यात घेतली. दरम्यान, मादी अजगराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत ती सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मादी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र, नैसर्गिक अधिवासात अंडी सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे वन विभागाने ही अंडी कृत्रिम उष्मायनासाठी ‘रॉ’ संस्थेकडे सुपूर्द केली.

‘रॉ’ संस्थेतील झूलॉजिस्ट चिन्मय जोशी यांनी या अंड्यांची जबाबदारी घेतली. संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात अनुकूल तापमान, आर्द्रता आणि नियमित निरीक्षणाखाली दोन महिने यशस्वीरित्या अंडी उबवण्यात आली. चार दिवसांपूर्वी पहाटे अजगराची २२ पिल्ले अंड्यांतून बाहेर आली. सर्व पिल्ले निरोगी असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना निसर्गात मुक्त करण्यात आले. ही प्रजाती संरक्षित असून त्यांचे पुनर्वसन महत्त्वाचे होते. मादी निरोगी असल्यामुळे त्याचवेळी तिला अधिवासात सोडण्यात आले होते, असे ‘रॉ’चे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षित प्रजाती

ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत. या प्रजातीला त्रास देणे, पकडणे, मारणे, विकणे किंवा पाळणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. आययूसीएनच्या संकटग्रस्त यादीत या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. जंगलतोड, अधिवास नष्ट होणे, बेकायदेशीर व्यापार यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. अजगर बिनविषारी साप असून निसर्गात उंदीर, पक्षी, ससे यांसारख्या प्रजातींचे संतुलन राखतो.