मंत्रालय इमारतीचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उद्योगपतींना किंवा निरनिराळ्या उद्योगांच्या प्रतिनिधींना मंत्रालयात प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्यांनाही सर्व सामान्यांप्रमाणे प्रवेशासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. ही बाब राज्याच्या उद्योग विभागाला खटकली आहे. त्यामुळे उद्योगपतींना सन्मानपूर्वक मंत्रालयात प्रवेश द्यावा, असे फर्मान या विभागाने काढले आहे.
मंत्रालयाच्या दुरुस्तीच्या कामामुळे काही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. मंत्री, सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच मर्यादित वाहनांना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. मंत्रालयात बैठकांसाठी किंवा इतर कामांसाठी येणाऱ्या उद्योगपतींचीही अडचण होत आहे. त्याबद्दल उद्योग विभागाने नाराजी व्यक्त केली आहे. उद्योग विभागाशी संबंधित कामासाठी किंवा उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांची आधी वेळ घेऊन भेटायला येणारे विविध उद्योगांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी वा वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्या वाहनांस मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा, असे या विभागाने मंत्रालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना कळविले आहे.