मुंबई : भारतीय रेल्वेचे तत्काळ तिकीट काढताना मोठी गडबड होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. तत्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू केल्यानंतर एका मिनिटातच सर्व तिकिटे आरक्षित होतात. परिणामी, तत्काळ सुविधेचा कोणताही लाभ सर्वसामान्य प्रवाशांना होत नाही. त्यामुळे रेल्वे मंडळाने याबाबत ठोस पावले उचण्यास सुरुवात केली आहे. तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर ती ३० मिनिटांच्या कालावधीपर्यंत आरक्षित होणार नाहीत.

यासह १ जुलैपासून फक्त आधार प्रमाणित वापरकर्त्यांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळ आणि ॲपद्वारे तत्काळ तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. तर, १५ जुलैपासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी आधार आधारित ‘ओटीपी’ प्रमाणीकरण देखील अनिवार्य केले जाईल.

भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटे आरक्षित करण्यास प्रचंड कसरत करावी लागते. तर, प्रतीक्षा यादीतील तत्काळ तिकिटे मिळत असल्याने, प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. एका सर्वेक्षणानुसार, गेल्या १२ महिन्यात ऑनलाइन तत्काळ तिकिटे आरक्षित करण्यात अडचणी आल्याचे १० पैकी ७ जणांनी मत व्यक्त केले. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटात तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे एका प्रवाशाने सांगितले.

वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १० वाजता आणि विनावातानुकूलीत डब्यासाठी सकाळी ११ वाजता तत्काळ तिकीट आरक्षित होण्यास सुरुवात होते. परंतु तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात केल्यानंतर एका मिनिटांतच सर्व तिकिटे आरक्षित होऊन, दुसऱ्या मिनिटांला तिकीट प्रतीक्षा यादीत जातात. त्यामुळे तत्काळ तिकीट सुविधेला कोणताही लाभ होत नाही.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट दलालांना वातानुकूलित आणि विनावातानुकूलीत डब्याचे तत्काळ तिकिटे सुरू झाल्यापासून पहिल्या ३० मिनिटांत तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १० ते सकाळी १०.३० पर्यंत आणि विनावातानुकूलित डब्यासाठी सकाळी ११ ते सकाळी ११.३० पर्यंत तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत दलालाच्या संगणकीकृत पीआरएस खिडकीवर तिकीट आरक्षण उपलब्ध असेल. त्यानंतर यंत्रणेद्वारे वापरकर्त्यांच्या मोबाइलवर ओटीपी प्रमाणीकरण केले जाईल. त्याद्वारे प्रवाशांना तिकिटे आरक्षित करता येतील. १५ जुलैपासून तत्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात येईल. याबाबतचे पत्र रेल्वे मंडळाने सर्व विभागांना पाठवले आहे.