साध्वी कांचनगिरी यांनी पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते असं मत व्यक्त केलंय. तसंच त्यावेळी हिंदूंना भारतात शरणार्थी व्हावं लागेल, असा दावा केलाय. त्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहनही केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांचनगिरी म्हणाल्या, “अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते. हिंदूस्थान त्या धोक्याच्या किनाऱ्यावर आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल. आज हिंदू जागे झाले नाही तर कधीच जागे होणार नाही.”

“काश्मीर आज नाही तर खूप आधीपासून जळत आहे. हे सर्व नेहरू आणि गांधीजींमुळे झालंय. पाकिस्तानला वेगळं केलं नसतं, तर काश्मीर का जळालं असतं? मग का फाळणी करण्यात आली. अफगाणिस्तान देखील आपलंच होतं. त्याला कंधारच्या नावानं ओळखलं जातं,” असंही त्यांनी नमूद केलं.

संन्यासी लोकांनी राजकारणात यावं का? कांचनगिरी म्हणतात…

कांचनगिरी म्हणाल्या, “जुना इतिहास आहे की संतांनी राज्यांचं नेतृत्व केलंय. चंद्रगुप्त मौर्या यांचं उदाहरण पाहू शकता. त्यांना चाणाक्याने मार्ग दाखवला. त्यानंतर ते यशस्वी राजा बनले. हे संतांचं कामच आहे की राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणं.”

“गरज पडल्यास राजकारणात येणार का?”

“माझा राजकारणाशी संबंध नाही. जे खरे राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात राहू. पण सध्या पदाबाबत कोणताही विचार नाही,” असंही कांचनगिरी यांनी सांगितलं.

“राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम”

कांचनगिरी म्हणाल्या, “राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे की बिहारमधील गावांमधून लोकांचं पलायन होतंय. तिथंच कंपन्या सुरू झाल्या तर लोकांना गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावं लागणार नाही. त्यांच्या याच भूमिकेला लोकांनी चुकीचं घेतलं. ते जितकं प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकंच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर करतात.”

“राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार करत आहेत. जे हिंदुत्वावर प्रेम करतात ते अयोद्धेशी जोडलेले आहेत. आम्ही त्याचं भव्य स्वागत करू. पूर्ण संत समाज त्यांच्यासोबत आहे. राज ठाकरे जे बोलतात ते करतात हे मला खूप आवडलं. देशाला अशाच लोकांची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील युपी-बिहारच्या लोकांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे,” असं मत कांचनगिरी यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“हिंदू राष्ट्र व्हावं ही आमची इच्छा आहे. आमची राज ठाकरे यांच्याशी विचारधारा जुळते आहे. हिंदू राष्ट्र धोक्यात आहेत. त्यामुळे हिंदूत्व विचारधारा असणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे,” असं आवाहनही कांचनगिरींनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanchangiri warn about afghanistan like situation in india in next 10 years pbs
First published on: 18-10-2021 at 14:04 IST