मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने केरळ रेल्वे आग प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी याला मंगळवारी रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केरळ पोलिसांचे एक पथक रत्नागिरीला रवाना झाले आहे.

व्यवसायाने सुतार असलेला ३० वर्षीय सैफी मंगळवारी रात्री ११.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात झोपलेला आढळला. या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही त्याला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महाराष्ट्र एटीएसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – पंडित कुमार गंधर्व यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन; जन्मशताब्दीनिमित्त ८, ९ एप्रिलला होणाऱ्या कालजयी कार्यक्रमाचे खास आकर्षण

हेही वाच – मुंबई : रुग्णालयांत औषध तुटीचे संकट? देयकाची रक्कम थेट उत्पादक कंपनींच्या खात्यात जमा होत असल्याने वितरक संतप्त

एका अज्ञात व्यक्तीने २ एप्रिल रोजी कन्नूरला जाणाऱ्या रेल्वेगाडीत प्रवेश केला, त्याने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकला, तसेच रेल्वेला आग लावली. दुर्घटना घडताच रेल्वेतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक बॅग, हिंदीतील काही लिखाण केलेली कागदपत्रे आणि मोबाईल जप्त केला. या मोबाइलवरून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी संपर्क साधल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घटनेनंतर केरळ पोलिसांनी साक्षीदाराच्या मदतीने संशयिताचे रेखाचित्र तयार केले. पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती आणि ती पथके उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आली होती.