मुंबई : माझ्या अब्रुनुकसानीबद्दल भरपाई म्हणून ५ कोटी रुपये द्यावेत आणि झाल्या प्रकाराबद्दल माफी मागत मला सन्मानाने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत परत बोलावण्यात यावे’, अशी मागणी अभिनेते किरण माने यांनी पॅनोरमा प्रॉडक्शनकडे केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी प्रॉडक्शनकडे ही मागणी केली असल्याचे स्पष्ट केले, मात्र त्याचबरोबर आपल्याला या प्रकरणी जाणिवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
किरण माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे वकील असीम सरोदेही उपस्थित होते. या प्रकरणी पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, अशी माहिती देत आपल्यावरील आरोप खोटे असून निर्मात्यांनी ठरवून सापळय़ात अडकवले आहे, असा आरोप माने यांनी केला. पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊसने कायद्याच्या कुठल्याही आधाराशिवाय मानेंना मालिकेतून काढून टाकले असून त्यांचे व्यावसायिक नुकसान केले आहे, तसेच त्यांची इतरत्र मानहानी केल्यामुळे प्रॉडक्शन हाऊस मानेंच्या वैयक्तिक, कौंटुबिक नुकसानीला जबाबदार आहे म्हणूनच किरण मानेंना त्यांनी ५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच लेखी स्वरूपात माफी मागत बेकायदा त्यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे त्यांना सन्मानाने मालिकेत परत घ्यावे, अशी मागणी नोटीशीद्वारे केली असल्याचे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले. प्रॉडक्शन हाऊसने तसे न केल्यास आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू, असेही सरोदे यांनी सांगितले.