मुंबई : पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात रविवारी आयोजित करण्यात आलेली मूक मानवी साखळी अंतिम क्षणी रद्द करण्यात आली. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतरही महानगरपालिकेने आवश्यक ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ न दिल्यामुळे ही साखळी आयोजित करता आली नाही. तरीदेखील तलावाचे प्रदूषण थांबवण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पवई तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. सांडपाण्यामुळे तलावाची परिसंस्था धोक्यात येते. याविरोधात आम्ही शांततेत निदर्शने करत आहोत, परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे आंदोलन थांबलेले नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.

काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालावाची स्वच्छता करण्यासाठी आणि तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी ‘सेव्ह पवई लेक’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, पवई तालावातील जलपर्णीचा वेढा रोखण्यासाठी तालावातील सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर तलावातील जलपर्णीही काढण्यात येत आहे. तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याबाबत स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त केली असून जोपर्यंत तलाव सांडपाणी मुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) तीन वर्षांपूर्वीच पवई तलाव संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) समन्वय समितीची बैठकही घेतली होती. तरीही आजपर्यंत सांडपाणी थेट तलावात सोडले जाते हे धक्कादायक आहे, असे पर्यावरणप्रेमी बी.एन.कुमार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तलाव संवर्धन क्षेत्र घोषित करावे पवई तलाव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करावा, अशी मागणी पवईतील जलवायू विहार येथील रहिवासी पामेला चीमा आणि इतर रहिवाशांनी केली आहे. तेथील रहिवासी म्हणून आम्ही परिसराचे संरक्षण करण्यास बांधील आहोत, असे मत बी.एन.कुमार यांनी व्यक्त केले.