मुंबई : महाविकास आघाडीत काही जागांवरून निर्माण झालेला तिढा सोडविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी चर्चा झाली. वंचितची एकूण भूमिका लक्षात घेता जागावाटप निश्चित केले जाणार आहे. सांगली व भिवंडीच्या जागांवरून महाविकास आघाडीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी या दोन्ही जागांवर पक्षश्रेष्ठींनीच निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली आहे. हेही वाचा >>> मुंबईतील ‘या’ लोकसभा मतदारसंघातून मराठी अभिनेत्रीला मिळणार उमेदवारी? शिंदे गटाची रणनीती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेच्या वेळी काँग्रेसचे कोणीही उपस्थित नव्हते. काँग्रेसला दूर ठेवून ही बैठक झाल्याची चर्चा त्यातून सुरू झाली. पण सांगली व भिवंडीच्या जागांवरील वादावर चर्चेत सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला. त्यातूनच त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपाचा तिढा कायम आहे. सांगलीची जागा लढविण्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाने परस्पर जाहीर केल्याने ते काँग्रेस नेत्यांना पसंत पडलेले नाही. भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सहमती होऊ शकलेली नाही. सांगली आणि भिवंडीच्या वादात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी तोडगा काढावा, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिल्लीतील नेत्यांशी संपर्कात असतात. त्यांच्या कलाने पक्षात निर्णय घेतले जात असल्याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजीची भावना आहे. सांगलीची जागा शिवसेनेला सोडल्यास तेथे भाजपचा विजय सोपा होईल, असे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही हे आता स्पष्ट झाले. शिवसेनेशी असलेली युती संपुष्टात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. यामुळे वंचितशिवाय लढण्यावर कोणती रणनीती आखता येईल यावरही चर्चा झाली. शिवसेनेच्या १६ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आज घोषणा मुंबई : वंचित बहुजन आघाडीची (व्हीबीए) राज्यातील महाविकास आघाडीबरोबरची बोलणी फिसकटली असून उद्या, मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर भूमिका स्पष्ट करणार आहेत. या वेळी ते लोकसभा मतदारसंघातील काही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.वंचितला महाविकास आघाडीने ४ जागा देऊ केल्या होत्या, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. यासंदर्भात ‘वंचित’च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या की, प्रकाश आंबेडकर आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार आहेत, त्या पत्रकार परिषदेत काही उमेदवारांची घोषणासुद्धा होऊ शकते.