मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाले. एका अर्थाने ही नव्याची सुरुवात. उत्तरायणाच्या या मुहूर्तावर आणि ६६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने नवी मुंबई, पनवेल आणि उरण या ‘महामुंबई’तील वाचकांसाठी खास ‘महामुंबई वृत्तान्त’ ही चार पानी पुरवणी आणली आहे. या भागांतील विविध बऱ्यावाईट घटनांचा मागोवा घेण्याबरोबरच येथील समस्या-प्रश्नांना उत्तर शोधून प्रशासनाकडे त्याची तड लावण्याचा प्रयत्न आजपासून सुरू होणाऱ्या ‘महामुंबई वृत्तान्त’मधून केला जाईल. तेच खरे ‘उत्तरा’यण असेल.    
एकविसाव्या शतकातील सुनियोजित शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईच्या निर्मितीला आता साडेतीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. एखाद्या शहराच्या वाढीसाठी हा तसा पुरेसा कालावधी. याच कालावधीत नवी मुंबईत अनेक स्थित्यंतरे घडली. त्यात राजकीय, सांस्कृतिक तसाच भौगोलिक स्थित्यंतराचाही समावेश आहे. सिडकोच्या बैठय़ा, दुमजली इमारतींपासून ते उंचउंच टॉवपर्यंत, पालिका शाळांपासून ते आंतरराष्ट्रीय शाळांपर्यंत, चकचकीत मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहे, क्रीडासंकुले, मैदाने, रुग्णालये याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प यांमुळे या शहराचा चेहरामोहराच बदलला. काळाच्या या ओघात शहराच्या सीमा पार मुंबईचे महाद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलपासून उरणपर्यंत विस्तारल्या. या विस्तारलेल्या शहराच्या झगमगाटी कवडशांचा वेध माध्यमांनी आजवर घेतला; पण शहर जसे विस्तारले तशीच नागरी समस्यांचीही व्याप्तीही वाढत गेली, ही गोष्ट काहीशी दुर्लक्षितच राहिली. ती उणीव दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने हे पुढचे पाऊल टाकले आहे.
मुंबई उभी-आडवी वाढायला लागली तशी तिची जागा आक्रसत गेली. झोपडय़ा वाढत गेल्या, उपनगरेही दूरदूर गेली. या सर्व पाश्र्वभूमीवर प्रतिमुंबईची गरज भासू लागली. त्यातूनच ७०च्या दशकात नवी मुंबई निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली.. हा झाला इतिहास. भूतकाळ कितीही रम्य असला तरी वर्तमानातील समस्यांची तीव्रता त्याने कमी होत नाही. वर्तमानातील नवी मुंबईकरांच्या समस्यांना हात घालून तसंच त्यांचं सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या परंपरा व उपक्रमांना आधार देत नवी मुंबईकरांचे भविष्य समृद्ध करण्यासाठी ‘लोकसत्ता’चे हे अक्षरव्रत आहे..