मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ते ३६ हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

हेही वाचा >>> दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार

अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी ७० लाख रुपये आणखी अर्थसहाय्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रचलित दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये या दराने दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती. आता प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये मदत मिळणार आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये दिले जात होते, आता २७ हजार रुपये मिळतील. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल १८ हजार रुपये दिले जात होते, आता वाढीव दरानुसार प्रतिहेक्टर ३६ हजार रुपये देण्यात येतील.