मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे गणित जुळविण्याकरिता विविध समाज घटकांना खूश करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवस बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये विविध निर्णय घेतले जातील. तसेच गेल्या दोन दिवसांत २७० शासकीय निर्णय जारी करून निधीवाटप आणि विविध निर्णय घेण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम या आठवडयात जाहीर केला जाईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णयांचा धडाका लावण्यात आला आहे. हेही वाचा >>> रे रोड स्थानकाजवळ लोकलचा संभाव्य अपघात टळला; निश्चित थांबा ओलांडून तीन डबे गेले पुढे सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त मंगळवारी मंजूर करून लगेचच आदेश जारी केले जातील, असे सांगण्यात आले. बैठकांसाठी विविध खात्यांकडून महत्त्वाचे आणि मतदारांवर प्रभाव पाडू शकतील असे निर्णय घेण्यासाठी माहिती मागविण्यात आली होती. यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीची कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली आहे. दरवर्षी आर्थिक वर्षांअखेर शेवटच्या आठवडयात निधी वाटपांचे शासकीय आदेश मोठया प्रमाणावर जारी केले जातात. आचारसंहिता लागणार असल्याने गेल्या दोन दिवसांमध्ये २७०च्या आसपास शासकीय आदेश काढण्यात आले आहेत. यात निधी वाटप, महत्त्वाचे निर्णय आणि बदल्यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या कामांसाठी निधी वाटपाचे आदेश जारी केले जातील.