कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. गेली २८ वर्ष या मतदारसंघातून भाजपा उमेदवार निवडून येत होता. मात्र, यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपाचा पराभव केला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे शहर असून माजी राज्यपाल व भाजपाने सातत्याने या विचाराचा अपमान करण्याचे पाप केले. तसेच जनतेला हे आवडले नाही म्हणून जनतेने मतपेटीतून भाजपाला जागा दाखवून दिली आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले म्हणाले, “कसबा पेठ पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पैशाचा वारेमाप वापर करत मते विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. पैशाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या भाजपाला जनतेने चोख उत्तर दिले आहे. कसब्याच्या जनतेला भारतीय जनता पक्षाने गृहीत धरले होते, पण भाजपाची खरी संस्कृती काय आहे हे या पोटनिवडणुकीत कसबा व महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे.”

“मंत्री व पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करण्यात आल्याचे प्रकार घडले, तडीपार गुंड मंत्र्यांसोबत फिरतानाही लोकांनी पाहिले. पैसे वाटून, दहशत निर्माण करुन निवडणूक जिंकण्याचे भाजपाचे प्रयत्न जनतेने उधळून लावले,” असं मत पटोले यांनी व्यक्त केलं.

पटोले पुढे म्हणाले, “कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह डझनभर मंत्री तळ ठोकून होते. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. महागाई, बेरोजगारीने त्रस्त जनता व छोटे व्यापारी यांनी भाजपाला धडा शिकवला आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपा कसे करतो याचे दर्शन कसबा पोटनिवडणुकीत जनतेने पाहिले. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा भाजपाची उलटी गिनती सुरू झाल्याचे दर्शवणारा आहे.”

“तामिळनाडू व पश्चिम बंगालमधील पोटनिव़डणुकीतही काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. त्रिपुरामध्ये काँग्रेसचा एकही आमदार नव्हता तेथे पाच मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले, नागालँड विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. देशभरातील निकालात काँग्रेस पक्षाला लोकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे, आगामी काळातील निवडणुकांमध्ये हेच चित्र कायम राहणार असून ही परिवर्तनाची सुरुवात आहे,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हेही वाचा : नाराजीनाट्यानंतर बाळासाहेब थोरात-नाना पटोले यांची पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्यात…”

रविंद्र धंगेकरांना बहुतमाने निवडून दिले त्याबद्दल कसबा पेठ मतदार संघातील जनतेचे व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नाना पटोले यांनी यावेळी आभार व्यक्त केले. कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून, फटाके फोडून साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आमदार विकास ठाकरे, आ. वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, उत्कर्षा रुपवते, प्रवक्त्या भावना जैन, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, अर्चना राठोड, ज्येष्ठ नेते दत्ता नांदे, अशोक आमानकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra congress president nana patole comment on kasaba bypoll election result pbs
First published on: 02-03-2023 at 21:18 IST