लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ मंत्र्यांचे शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेऊन आचारसंहिता असताना शेतकऱ्यांना कशी मदत करायची आणि केवळ चार महिन्यांचे लेखानुदान मंजूर केले असल्याने मदतीसाठी निधी कुठून उपलब्ध करायचा या दोन प्रश्नांवर चर्चा केली. या दोन्ही प्रश्नांची फक्त केंद्राच्या मदतीनेच सोडवणूक करता येऊ शकेल, अशा निर्णयाप्रत मंत्रिमंडळ आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री व काही वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेण्याचे ठरले. ही भेट शुक्रवारीच होईल.  शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आणि केंद्राकडून निधी मिळावा या दोन मागण्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधानांनाच साकडे घातले जाईल.