मुंबई : राज्य सरकारने अमेरिकेतील आयोवा राज्याशी केलेल्या भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारने आयोवाशी सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या कराराद्वारे राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
आयोवा हे उत्पादन व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे राज्यातील शेती, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. आयोवा विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त सहकार्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान राज्यात आणले जाईल. भारताने नवीकरणीय ऊर्जेत केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि या करारामुळे या क्षेत्रात आणखी नवे प्रकल्प साकारतील.
महाराष्ट्राने याआधी जपान व जर्मनीसोबत ‘सिस्टर-स्टेट ’ करार करून व्यापार, उद्योग व सांस्कृतिक देवाणघेवाणीला गती दिली आहे. अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबत हा पहिलाच करार असून तो भारत-अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
दीर्घकालीन भागीदारीचे आश्वासन – राज्यपाल किम रेनॉल्ड्स
भारतामधील सर्वात गतिमान राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राशी भागीदारी करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा करार नवोपक्रमांना चालना देणारा, आर्थिक समृद्धी वाढविणारा आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारा धोरणात्मक निर्णय आहे. दोन्ही राज्ये औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात नवे प्रकल्प उभारतील. दरवर्षी दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ परस्पर भेट देऊन या सहकार्याला अधिक दृढ करतील, असे आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांनी नमूद केले.
या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैग, विकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या करारामुळे होणारे फायदे :
– शेतीत आयोवाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापरामुळे उत्पादनक्षमतेत वाढ
– अन्नप्रक्रिया उद्योगात वाढ, त्यामुळे शेतीमालाला अधिक मूल्य व निर्यात संधी
– डिजिटलायझेशन व तंत्रज्ञानात सहकार्य, स्मार्ट गव्हर्नन्स, ई-सेवा व डिजिटल शेतीसाठी नवीन उपाय
– आयोवाच्या आरोग्यसेवा प्रणाली, संशोधन व प्रशिक्षणामुळे ग्रामीण व शहरी आरोग्य सेवेत सुधारणा – व्यावसायिक प्रशिक्षण, नवीन कौशल्ये व औद्योगिक सहकार्यामुळे रोजगाराच्या संधी