मुंबई : भारत – पाकिस्तानदरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करीत राज्यातील हजारो आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह देशाच्या अखंडतेचा ध्यास धरावा, असे आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले. दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतीय जनतेचा फाळणीचा संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या यातना, विस्थापन आणि बलिदानांच्या स्मृतीचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीत सामाजिक सलोख्याची भावना दृढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट २०२१ रोजी हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देऊन रोजगार आणि उद्योगास आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीआयमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येतात. याचाच एक भाग म्ह्णून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानसोबतच सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान असणे आवश्यक असल्याने आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वृद्धिगत करणारा कार्यक्रम आयोजित करावा असे निर्देश कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. याच श्रुंखलेतील एक भाग म्ह्णून ऑगस्टमध्ये विभाजन विभीषिका स्मरण दिवस पाळण्यात आला. त्यानुसार राज्यातील खाजगी आणि शासकीय अशा सुमारे एक हजार संस्थांमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले.