कर्नाटकव्याप्त सीमाभागातील मराठी भाषिकांचा भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून चर्चा सुरू झाली. त्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी अजब वक्तव्य करत मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची स्थानिक जनतेची मागणी असल्याचा दावा करत कर्नाटकात समावेश होईपर्यंत मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. या मागणीचा निषेध करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला पुरावा

“भाजपाचे कर्नाटकातील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात निंदा करतो. सवदी यांना समजलं पाहिजे की ज्या महाजन समितीचा हवाला ते देत आहेत, तो अहवाल काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला मुंबईचा नाही. तो बेळगाव आणि जवळपासच्या मराठी भाषिक भागाचा आहे. मुंबईविषयी ते इतकं बेजबाबदार बोलू शकतात. मला तर आश्चर्य वाटतंय की, भाजपाचे चमचे, भाजपाचे नेते, देवेंद्रे फडणवीस जे खूप मोठं मोठ्या गोष्टी बोलत असतात. त्यांना हे दिसत नाही का? मुंबईविषयी कर्नाटकाचा भाजपाचा उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि आपण मुंबईविषयी एक शब्द काढला नाही. गप्प बसला आहात. कंगना रणौतसारख्या दोन टक्क्यांच्या कलाकारांने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं, तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे तिला झाशीची राणी म्हणत होते. आज भाजपा उपमुख्यमंत्री मुंबईविषयी बोलत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. महाराष्ट्र व मुंबईविषयी तुमचं हेच प्रेम आहे का?,” अशी टीका भाई जगताप यांनी केली.

आणखी वाचा- मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

आणखी वाचा- “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये”

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी म्हटलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnatka border dispute bhai jagtap slam to devendra fadnavis and bjp leaders bmh
First published on: 30-01-2021 at 08:38 IST