मुंबई : ऊर्जा निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने राज्य अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी कार्यवाही सुरू असून हरित ऊर्जा निर्मितीसह उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा ॲक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जानिर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा विभागाबरोबर ९ जागांवर उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी ३ सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पांमध्ये सुमारे ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून, ८ हजार ९०५ मेगावॅट वीजनिर्मिती आणि ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
तीन करारांवर स्वाक्षऱ्या
● जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती यांच्याबरोबरच्या उदंचन जलविद्युतप्रकल्पासाठी ३,१४५ मेगावॅट क्षमतेच्या, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लि. यांच्यामार्फत २,११० मेगावॅट, तर अवादा ॲक्वा बॅटरिज यांच्याबरोबर ३,६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
● महानिर्मितीमार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅट, कोडाळी येथे २२० मेगावॅट, वरसगाव येथे १,२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १,६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लि. मार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅट, निवे येथे १२०० मेगावॅट आणि वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २,४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १,२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.