मुंबईः चेंबूर येथे घरगुती वादातून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या महिलेच्या अंगावर पतीने पेटता कागद फेकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला गंभीर भाजली असून तिच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चेंबूर येथील आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
३८ वर्षीय तक्रारदार महिला पतीसोबत चेंबूर परिसरात राहते. सदर महिला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तक्रारीनुसार, महिला शुक्रवारी कामावर जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी आरोपी पतीने तिच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केली. पण कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्यामुळे महिलेने त्याला नकार दिला. त्यानंतर पती संतापला. त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले व स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेच्या पतीने घरातील गॅसच्या शेगडीवर कागद पेटवून तो महिलेच्या अंगावर फेकला. त्यामुळे आग लागली. त्या महिला गंभीररित्या भाजली. तिला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
महिला बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. पतीने अंगावर पेटता कागद आपल्या फेकून आग लावल्याचे महिलेने जबाबात सांगितले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५२, ११५ (२) अंतर्गत पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत महिलेच्या छातीवर, पोटावर, पायाला, मनगटापासून कोपरापर्यंत भाजल्याच्या गंभीर जखमा आहेत. तिच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कौटुंबिक हिंसाचार
गेल्या दीड वर्षात मुंबई पोलिसांनी कोटुंबिक हिंसाचाराचे ६०० हून अधिक गुन्हे मुंबईत दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी एका महिलेची हत्या, तर ९ महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या त्रासाला कंटाळून १६ महिलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.