लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चार हजार ६५४ (१४ भूखंडासह) घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील दोन हजार ४८ घरांसाठी उद्या, शुक्रवारपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. विरार- बोळींजमधील या दोन हजार ४८ घरांची काही कारणांमुळे विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे या घरांचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.

कोकण मंडळाच्या विरार-बोळीज प्रकल्पातील दोन हजार ४८ घरांसाठी तीन वेळा सोडत काढण्यात आली होती. मात्र या घरांची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- मुंबईत संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता

या योजनेसाठीच्या अर्ज विक्री- स्वीकृतीसाठी कमी कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. या योजनेतील घरासाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या घरांसाठीच्या पात्र अर्जदारांची प्रारूप यादी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता, तर अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १० मे रोजी यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर होईल.