मुंबई : एमएचटी सीईटीच्या दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ही परीक्षा १८१ केंद्रांवर होणार असून यापैकी नऊ केंद्रे महाराष्ट्राबाहेर आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच पीसीबी गटासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा २ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी दिली.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच पीसीएम गटासाठी प्रवेश परीक्षा १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये पुण्यामधून सर्वाधिक ५७ हजार ४२५ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल मुंबईतून ३९ हजार ५५५, नागपूरमधून ३० हजार ५०३ आणि नाशिकमधून २९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून कमी अर्ज आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार २७९ अर्ज आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून पीसीएम गटासाठी ३ हजार ३८, तर रायगड जिल्ह्यातून ५ हजार ५६५ अर्ज आले आहेत. पीसीएम गटासाठी महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातून ३० हजार ८९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नवी दिल्लीतून सर्वाधिक ५ हजार ८८३ अर्ज आले आहेत. तर सर्वात कमी २८६ अर्ज पणजीमधून आले आहेत. ही परीक्षा १८१ केंद्रांवर होणार असून यातील नऊ केंद्र राज्याबाहेर आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या पीसीएम गटातील परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनेनुसार प्रवेशद्वार बंद होण्यापूर्वी उमेदवाराने सीईटी परीक्षा केंद्रात पोहोचावे. प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेच्या ३० मिनिटे आधी उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी हजर राहावे. सोबत प्रवेशपत्रासह अधिकृत ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रात दर्शविलेले नाव आणि छायाचित्र यामध्ये काही तफावत आढळल्यास परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवेश पत्रावरील सर्व सूचनांचे कोटेकाेरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.