करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने ३० ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. करोनामुळे सध्या राज्यातील मंदिरांना टाळ लागलंय. राज्यातील मंदिरं उघडण्यावरून घमासान सुरु आहे. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा वारंवार उचलूनही धरला गेला आहे. राज्य हळूहळू अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपं मात्र उघडली गेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जातेय. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर आता मनसेने यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. लोकसत्ताचा व्हिडीओ शेअर करत मनसेने, "कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल," असं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर हे कोणाच्या आदेशाने करतात याची चौकशी करण्याची मागणीही केलीय. मंगळवारी मुंबई पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करोना निर्बंधांच्या आड सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध जपणारी आणि सर्वसामान्यांच्या त्रासात विनाकारण भर घालणारी दुटप्पी धोरणं सरकार आखत असल्याची टीका केली होती. तसेच "सर्व मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. अन्यथा, मंदिरांबाहेर आम्ही घंटानाद करू," असं म्हटलं होतं. याचाच संदर्भ लोकसत्ता डॉट कॉमच्या व्हिडीओशी जोडून मनसेने व्हिआयपींना परवानगी दिली जाते याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल, असं मनसेनं म्हटलं आहे. दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनीही या प्रकरणावरुन टीका केली आहे. "घंटानाद करा किंवा आणखी कुठला नाद करा, पण आमचा नाद करू नका' असं म्हणणाऱ्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे दात त्यांच्याच- शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे यांच्या पराक्रमाने- घशात अडकले आहेत. खासदार शेवाळे, सेलिब्रिटी निर्माती एकता कपूर यांसारख्या व्हीआयपींना सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मागच्या दाराने प्रवेश देणारे न्यासाचे अध्यक्ष श्री. भावोजी बांदेकर हा प्रकार शिवसेनापक्षप्रमुख- मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या 'आदेशा'ने करतात का, याचीही चौकशी व्हायला हवी. लाडक्या भावोजींचं आता काही खरं नाही," असं फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद असून सर्वसामान्यांसाठी मंदिरं सुरु करण्यात यावी यासाठी भाजपाने आंदोलन सुरु केलं असून मनसेनेही तशीच मागणी केलीय.