मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एचएचटी सीईटीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणे अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र या बदलासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या यंदापासून तीनऐवजी चार फेऱ्या राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. हा बदल अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही करण्यात येणार असून, याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सूतोवाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाला तरी अद्यापपर्यंत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीमध्ये बदल करण्यासंदर्भातील कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही किंवा त्यासंदर्भातील शासन निर्णयही काढण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळाच्या १७ जून रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते.

मात्र या बैठकीतही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील निकाल वेळेवर लावूनही प्रवेश प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होईल, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. प्रवेश प्रक्रियेच्या निर्णयाबाबत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य सरकारकडून प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नियम व माहिती पुस्तिका उपलब्ध होताच प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय होणार बदल ?

तीन फेऱ्यांऐवजी चार फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रथम प्राधान्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये अनुक्रमे पहिले तीन व पहिले सहा महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम बंधनकारक असणार आहेत. फेरीनुसार निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांनी त्या जागांवर प्रवेश न घेतल्यास त्यांचा त्या जागेवरील दावा आपोआप रद्द होईल. तसेच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा ऑनलाइन प्राधान्यक्रम भरण्याची किंवा त्यात बदल करण्याची मुभा असेल.