मुंबई : न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे अकरावी प्रवेशाची २६ जून रोजी जाहीर होणारी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आता ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलैदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे २६ जून २०२५ रोजी पहिल्या फेरीसाठी यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालयामधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी २६ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात येणारी पहिली गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलैदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले.
दरम्यान, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार गुरुवारी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित होते. त्यामुळे गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत होते. पण गुणवत्ता यादी दर्शवण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमाक पडले होते.