मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने शुक्रवारी १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरविले. एक आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालय दोषींना शिक्षा सुनावणार आहे.
कमाल अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, ऐत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, अासिफ खान, तन्वीर अन्सारी, जमीर शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, सोहेल शेख, आलम शेख, मुझम्मिल शेख, मोहम्मद शफी अशी दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अब्दुल वाहिद शेख असे निर्दोष ठरविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश वाय डी. शिंदे यांनी या प्रकरणी निकाल दिला. संघटितपणे गुन्हेगारी कट रचणे, हत्या घडवून आणणे यासह मोक्कामधील विविध कलमांखाली १२ आरोपींना दोषी ठरविण्यात आले.
११ जुलैला पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये संध्याकाळच्यावेळी अवघ्या ११ मिनिटांच्या काळात सात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. या स्फोटांमध्ये १८९ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. तर तब्बल ८२४ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी अनेकांना स्फोटामुळे कायमचे अपंगत्व आले. मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह एकूण १३ जणांना अटक केली. त्यांच्यावरील आरोपांची सुनावणी विशेष न्यायालयामध्ये सुरू होती.
दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये ३० आरोपींची नावे आहेत. त्यापैकी १३ पाकिस्तानी नागरिक असून, १७ भारतीय नागरिक आहेत. १३ जणांना अटक करण्यात आली असून, अद्याप १७ जण फरार आहेत. फरार असलेल्या १७ आरोपींपैकी ४ भारतीय असून, त्यांचा शोध अद्याप सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षाने या प्रकरणी एकूण ६००० पानांचे पुरावे सादर केले असून, सरकारी पक्षाने या प्रकरणामध्ये १९२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली तर बचाव पक्षाने ५२ साक्षीदार न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने स्वतःहून एका साक्षीदाराची साक्ष नोंदविली होती.