मुंबई : वेश्याव्यवसाय करण्यासाठी बांगला देशातील तरुणींना मासिक वेतन देण्यात येत असल्याचे प्रकरण परिमंडळ ११ च्या विशेष पोलीस पथकाने उघडकीस आणले. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून १४ बांगला देशी तरूणींची सुटका करण्यात आली आहे. चांगल्या पगाराचे आमिष दाखवून त्यांना भारतात आणले होते. त्यानंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.
शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात मालवणी पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. मालवणीतील जिल्हाधिकारी मैदानाच्या प्लॉट नंबर २६ येथे काही संशयित बांगला देशी नागरिक रहात असल्याची माहिती ७ जून रोजी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तीन बांगला देशी महिला आणि एक पुरूष असे एकूण चौघे आढळले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आंतरारष्ट्रीय वेश्याव्यसाय टोळीचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागले. या तीन महिलांना नोकरीचे आमिष दाखवून भारतात आणले होते. मात्र त्यांना नोकरी न देता वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दलाल मन्सार मोहम्मद शकील याला अटक केली आणि ३ महिलांची सुधारगृहात रवानगी केली. यानंतर परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले. मालवणी, बोरिवली आणि कांदिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता.
या टोळीचा मुख्य सूत्रधार फारूख हा बांगला देशी नागरिक आहे. त्याने पश्चिम बंगाल येथे आपली आपले दलाल नेमले होते. फारूख बांगला देशातील १९ ते ३० वर्षे वयोगटातील गरजू तरूणींनानोकरीचे आमिष दाखवून भारतात आणत होता. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात ४० ते ५० हजार रुपयांची नोकरी मिळेल, असे आश्वासन देण्यात येत होते. त्यानंतर तो दलालांकडे या तरुणींना पाठवायचा. एका महिलेमागे फारूख त्यांच्याकडून २० हजार रुपये घेत होता. जहांगिर नावाचा दलाल या महिलांन पश्चिम बंगाल येथे नेऊन ठेवायचा. तेथून शाहीन मालदार आणि मोहम्मद रझाक हे मुंबईतील वेगवेगळ्या दलालांकडे या महिलांची रवानगी करायचे.
मुंबईतील भाड्याने घेतलेल्या घरात या तरुणींना ठेवून त्यांच्याकडून मासिक वेतनावर वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. त्यांच्या वेतनातील १० टक्के रक्कम दलाल काढून घेत होते. उर्वरित रक्कम तरुणींच्या कुटुंबियांना ऑनलाईन पाठविण्यात येत होती. या प्रकरणी मालवणी येथील स्थानिक आरोपींनी या तरुणींना भारतीय असल्याचे दाखविण्यासाठी बनावट आधार कार्ड दिले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत आठ जणांना अटक करून ११ तरूणींची सुटका करण्यात आली आहे. वेश्याव्यवसायाच्या या टोळीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.