मुंबई : गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीत गोंधळ उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर मतदार टक्केवारी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिक कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज प्रणाली तयार केली आहे. या नव्या प्रक्रियेने अंतिम आकडेवारी उपलब्ध होण्यास लागणारा विलंब टाळण्यास मदत होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ही प्रक्रिया कार्यान्वित केली जाणार आहे.

मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्याने मतदान पार पडल्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींना फॉर्म १७ अन्वये आकडेवारी देणे बंधनकारक आहे. या प्रणालीत आता सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे मतदानाची अचूक आकडेवारी मिळणे आता शक्य होणार आहे. नवीन प्रणालीअंतर्गत, मतदानाच्या दिवशी प्रत्येक दोन तासांनी मतदानाची टक्केवारी ॲपवर नोंदविण्यात येणार आहे. ही माहिती स्वयंचलितरीत्या मतदारसंघ पातळीवर एकत्र केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणेच, अंदाजे मतदान टक्केवारी दर दोन तासांनी प्रसिद्ध केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मतदान प्रक्रिया पार पडल्यावर निवडणूक अधिकारी मतदान केंद्र सोडण्यापूर्वी अंतिम मतदानाची आकडेवारी लगेचच यंत्रणेवर सादर करतील. यामुळे माहिती जमा होण्यास लागणारा विलंब कमी होईल आणि निवडणूक आयोगाच्या ॲपवर वेळेत आणि अचूक माहिती उपलब्ध होईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे ही माहिती ऑफलाइन स्वरूपात साठवून, नेटवर्क पुन्हा उपलब्ध झाल्यावर ती अपलोड करता येईल. आगामी बिहार निवडणुकीआधी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.