मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. घरात पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. तर पाणी साचल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील वाहतूक कोलमडली, पाण्याखाली रेल्वे रूळ लूप्त झाल्याने लोकलचा वेग मंदावला. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुढील पाच दिवस मुंबईला सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला असून मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. मात्र, सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला. मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे विक्रोळी, वांद्रे, दादर, हिंदमाता, शीव, भायखळा, परळ, बोरिवली, कांदिवली, अंधेरी भुयारी मार्ग, टिळक नगर टर्मिनस, टेम्बी पूल परिसर, कुर्ला येथील शेख मेस्त्री दर्गा, नेहरूनगर या भागात पाणी साचले. परिणामी, या भागांतील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आणि वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. परिणामी, वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना सोसावा लागला. चिखलमय झालेल्या रस्त्यांवरून वाहने चालविण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. सकाळपासून पाऊस पडल्याने लालबाग, परळसह अन्य भागांतील भागातील बाजारपेठांमध्ये तुरळक रहदारी होती.

पाहा व्हिडीओ –

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळावी यासाठी एनडीआरएफ, सीडीआरएफ, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण, घाट भागात मुसळधार पाऊस
संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण किनारपट्टीवर धुवाँधार पाऊस कोसळत आहे. मध्य प्रदेशाच्या मध्य भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुजरात तटपासून ते महाराष्ट्र तटपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. यामुळे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी व्यक्त केला.