मुंबई : उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली आहे. मात्र त्यानंतरही गिरगाव चौपाटी येथे एका व्यक्तीने तब्बल दहा गोण्या भरून धान्य घातल्याची घटना उघडकीस आली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने स्वत:च ध्वनिचित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर टाकली आहे. गिरगाव चौपाटीवर तब्बल दहा गोण्या धान्य कबुतरांसाठी देतानाची ध्वनिचित्रफित एका व्यक्तीने स्वतःच तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. ही घटना ७ ऑगस्टची आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कबुतरांना धान्य मिळू शकलेले नाही. त्यामुळे आपण त्यांना धान्य घातले. यावेळी स्वयंसेवी संस्थेचे नाव घेऊन त्याने मुंबईत रोज ३०० किलो धान्य येते, असे त्याने ध्वनिचित्रफितीत नमुद केले आहे. तसेच त्यानंतरही त्याने ध्वनीचित्रफीतीत नावाचा जयघोष केला आहे. गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने कबुतरांचे थवे धान्य खाण्यासाठी जमल्याचे ध्वनिचित्रफीतीत दिसत आहे. ही व्यक्ती ७ ऑगस्ट रोजी पहाटे चौपाटीवर येऊन धान्य घालून गेली. आम्ही या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करू. मात्र सध्या चौपाटीवर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून डी. बी. मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चित्रफीतीच्या माध्यमातून संशयिताचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
कबुतरांना खाद्य घालण्यावरून सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली होती. तसेच खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे जैन समुदायाने आक्रमक होत दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून टाकली होती. तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर जैन समुदायाच्या एका व्यक्तीने कबुतरांना तब्बल दहा गोण्या धान्य घातल्याची घटना उघडकीस आली आहे.