मुंबई : मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (सीएसएमआयए) गुरुवारी विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल – दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. देखभालीच्या कामाला सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली आणि सखोल तपासणी व मूल्यांकनानंतर धावपट्टीचे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण झाले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात वर्दळीचे एकल धावपट्टीचे विमानतळ आहे. जेथे दररोज ९५० हून अधिक विमानाची वाहतूक होते.

पावसाळ्यात येणाऱ्या आव्हानांचा अंदाज घेत सीएसएमआयएने धावपट्टीच्या विविध तपासण्या केल्या. मान्सूनपूर्व उपायांची अंमलबजावणी करण्यात आली. यात पाणी साचणाऱ्या भागांचा शोध व तपासणी, पृष्ठभागावरील भेगा, डिसजॉइण्ट्स व टेक्स्चरमधील समस्या ओळखण्यासाठी यंत्राद्वारे, तसेच निरीक्षणाने धावपट्टीच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच, धावपट्टी व टॅक्सी वेवरील जवळपास ५ हजार एरोनॉटिकल ग्राऊंड लाइट्सची देखभाल, दुरुस्ती व तपासणी करण्यात आली. तसेच, धावपट्टीच्या सभोवतालीची दुरूस्तीची कामेही करण्यात आली. यात विद्युत तारांची दुरूस्ती करणे, पायाभूत सुविधा उभारणे, गवत कापणे आदी कामांचा समावेश होता.

हेही वाचा…गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक, १० जणांविरोधात गुन्हा

विमानतळ प्राधिकरणाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली होती. त्यानुसार विमानाच्या वेळापत्रकाचे नियोजित वेळापत्रक तयार केले होते. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली.