सात तलावांमध्ये ५३.८६ टक्के जलसाठा मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी, विहार या तलावांपाठोपाठ मोडकसागर व तानसा हे आणखी दोन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. मोडकसागर तलाव गुरुवारी पहाटे ३.२४ वाजता, तर तानसा तलाव पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला. सातही धरणांत मिळून सध्या ५३.८६ टक्के जलसाठा आहे. मुंबई आणि परिसरात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. गेल्या आठवडय़ात विहार व तुळशी हे मुंबई परिसरातील तलाव भरून वाहू लागल्यानंतर गुरुवारी पहाटे मोडकसागर व तानसा ही दोन धरणेही ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे मोडकसागर तलावाचे दोन दरवाजे, तर तानसा तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. मोडकसागर तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी ओसंडून वाहू लागला होता, तर तानसा तलाव २० ऑगस्ट २०२० रोजी पूर्ण भरून वाहू लागला होता. मात्र या वर्षी हे दोन्ही तलाव जुलैमध्येच भरून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सात तलावांपैकी चार तलाव पूर्ण भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी दूर झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. गुरुवारी पहाटे या सातही तलावात ७,७९,५६८ दशलक्ष लिटर म्हणजेच ५३.८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरण किती भरले? पाणीसाठा अप्पर वैतरणा ४.३१ टक्के ९७८ कोटी लिटर (९,७८० दशलक्ष लिटर) मोडकसागर १०० टक्के १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर ) तानसा ९९.६६ टक्के १४,४५९.३ कोटी लिटर (१,४४,५९३ दशलक्ष लिटर ) मध्य वैतरणा ४७.७१ टक्के ९,२३४.२ कोटी लिटर (९२,३४२ दशलक्ष लिटर ) भातसा ५१.३५ टक्के ३६,८१८.४ कोटी लिटर (३,६८,१८४ दशलक्ष लिटर ) विहार १०० टक्के २,७६९.८ कोटी लिटर (२७,६९८ दशलक्ष लिटर ) तुळशी १०० टक्के ८०४.६ कोटी लिटर (८,०४६ दशलक्ष लिटर )