मुंबई : सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) तिजोरीत मागील काही वर्षे खडखडाट होता. मात्र आता म्हाडाच्या तिजोरीत ३९.६९ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ मध्ये म्हाडाकडे ८,११३.८८ कोटी रुपये जमा होते. ही रक्कम २०२४-२५ मध्ये थेट ११,३३४.५१ कोटींवर (३.२२०.६३ कोटी रुपयांनी वाढ) गेली आहे. सोडतीद्वारे केलेल्या घरांच्या विक्रीसह अन्य माध्यमातून म्हाडाच्या तिजोरी भर पडली आहे.
म्हाडाच्या माध्यमातून राज्यभर सात विभागीय मंडळांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाते. या गृहनिर्मितीसाठी लागणारा निधी घरांच्या विक्रीतून वसूल केला जातो. त्यामुळे म्हाडाला काही वर्षांपर्यंत कुठेही निधीची चणचण नव्हती. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकासासह अन्य काही प्रकल्प म्हाडाने हाती घेतले आणि त्यासाठी मोठा निधी म्हाडाला खर्च करावा लागला. त्यामुळे म्हाडाच्या तिजोरीत दोन-अडीच वर्षांपूर्वी खडखडाट होता. निधी नसल्यानेच म्हाडाने पुनर्विकासासाठी ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी’ची (खासगी विकासक) नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावण्याचे प्रारुप स्वीकारले. आता मात्र तिजोरीत भर पडत असल्याने म्हाडाला दिलासा मिळाला आहे.
घरांच्या विक्रीतून १७०० कोटी रुपये
म्हाडाला २०२४-२५ मध्ये महसुली जमेपोटी ५००० कोटी रुपये मिळाले आहेत. यात चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), गुंतवणुकीवरील व्याज, इमारत परवानगी शुल्क, भाडे आणि सेवा आकारापोटी मिळणारी रक्कम अशा उत्पन्नाच्या स्त्रोतांचा समावेश आहे. तर भांडवली जमेपोटी म्हाडाला १७०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये विविध मंडळाच्या सोडतीद्वारे घरांच्या विक्रीतून जमा झालेल्या रक्कमेचा समावेश आहे.