मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बॅंंकेच्या निवडणूकीचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. या निवडणूकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जय सहकार पॅनेलने को ऑपरेटीव्ह न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडली असून न्यायालयाने सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणी आता १९ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बॅंक असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक २१ ऑगस्टला पार पडली. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीनंतर या निवडणूकीलाही महत्त्व आले होते. तब्बल ६० हजाराहून अधिक सभासद असलेल्या या बॅंकेच्या निवडणूकीला यंदा कामगारांसह अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. एकूण ४८ टक्के मतदान झाले होते.

यंदाच्या निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचेही पॅनेल या निवडणूकीत उतरले होते. तर तर विद्यामान संचालक मंडळापैकी एक असलेल्या विष्णू घुमरे यांचे एक पॅनेल होते. तर आणखी एक संचालक भानुदास भोईर यांचे एक पॅनेल होते. तर सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलने निवडणुकीआधीच माघार घेतली होती.

सदावर्ते यांच्या पॅनेलमधील चार उमेदवारांनी घुमरे यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीसाठी विष्णू घुमरे यांचे जय सहकार पॅनेल, भानुदार भोईर यांचे सहकार पॅनेल, बच्चू कडू यांचे जय महाराष्ट्र सहकार पॅनेल, समता पॅनेल, स्वराज्य पॅनेल आणि बीएमसी सहकार पॅनेल अशी सहा पॅनेल होती. तसेच एकूण १५३ उमेदवार रिंगणात होते.

मतमोजणी २२ ऑगस्ट रोजी कॉटनग्रीन येथे रात्री उशीरापर्यंत सुरु होती. मध्यरात्री या मतमोजणीवर बहुतांशी उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी काही काळ थांबवावी लागली होती. पहाटे भानुदास भोईर यांचे सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. तर जय सहकार पॅनेलचेही पाच उमेदवार विजयी झाले होते.

मात्र जय सहकार पॅनेलने या मतमोजणीवर आक्षेप घेतला असून याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. तसेच जय सहकार पॅनेलने को ऑपरेटिव्ह न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. मंगळवारी या प्रकरणी पहिली सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या निवडणूकीतील अपक्ष उमेदवारांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यांचे अर्जही यावेळी स्वीकारण्यात आले.

या मतमोजणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप घुमरे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात पोलिस तक्रार केली आहे. उमेदवारांच्या आक्षेपांची दखल न घेता निकाल जाहीर करण्यात आल्याचा आरोप घुमरे यांनी केला आहे. मतमोजणी पुन्हा करावी किंवा निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मतमोजणीच्यावेळी अनेक टेबलवर मते वाढवून दिली जात होती. याबाबतचे पुरावेही सादर केले असून उच्चस्तरीय चौकशी करून विनाविलंब न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वार्षिक महासभेला परवानगी दरम्यान, संचालक मंडळाला ३० सप्टेंबरच्या आत वार्षिक महासभा (एजीएम) घ्यावी लागणार आहे. त्याकरीता संचालक मंडळाला रोखता येणार नाही असेही न्यायालयाने यावेळी म्हटले. मात्र पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार असून सर्व उमेदवारांचे व संचालक मंडळांचे आणि सदस्यांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.