मुंबई: पाणी पुरवठा प्रकल्प, जल वितरण या क्षेत्रातील तज्ज्ञांची यादी तयार करण्याचे मुंबई महानगरपालिकेने ठरवले आहे. त्यासाठी या क्षेत्रातील कार्यरत संस्थांकडून पालिकेने स्वारस्य पत्र मागवली आहेत. पाणी पुरवठ्याशी संबंधित अनेक प्रकल्प मुंबई महापालिका राबवत असते. जलबोगदे, धरणे, जल वितरणाचे नवीन प्रकल्प असे प्रकल्प पालिकेचे आहेत. या प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागारांची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी पुरवठा प्रकल्प विभागाने अशा तज्ज्ञ संस्थांची यादी तयार करण्याचे ठरवले आहे. पाणी पुरवठा प्रकल्प, जलवितरण, पर्जन्य जलप्रकल्प, नदी पुनरुज्जीवन या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात विविध प्रकल्पासाठी त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.