मुंबई : महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून महामार्ग चकचकीत केला. या मोहिमेअंतर्गत महामार्गासह सेवा रस्ते आणि बस थांब्याचीही स्वच्छता करण्यात आली. १७ ते २२ मार्चदरम्यान दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत राबविलेल्या या मोहिमेत एकूण ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यात एकूण १५८ टन राडारोडा, ३५.४ टन कचरा आणि २४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन्ही महामार्गांलगतचे सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदींची स्वच्छता, महामार्गावरील दिशादर्शक फलक, झाडांच्या बुंध्यांची व कुंपणांची स्वच्छता आणि रंगरंगोटी, बस थांब्यांची स्वच्छता, आसन व्यवस्थेची दुरुस्ती, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, रस्त्यावर अडथळा ठरणारी निकामी, बेवारस वाहने तसेच अनधिकृत जाहिरात फलकांचे निष्कासन, पदपथांचे पेव्हर ब्लॉक व दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी आदी कामे करण्यात आली.

यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण १६ अद्यायावत स्वच्छता यंत्रांचा वापर करून दोन्ही महामार्गांवर व्यापक स्वच्छता करण्यात आली. मोहिमेची सुरुवात १७ मार्च रोजी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव येथून तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून झाली. त्यानंतर सलग सहा दिवसांच्या कालावधीत दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत स्वच्छता करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छता सुरूच राहणार’

या मोहिमेत सहा दिवसांच्या कालावधीदरम्यान दोन्ही महामार्ग मिळून एकूण ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यातून १५८.५ टन राडारोडा, ३५.४ टन कचरा आणि २४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करण्यात आल्या. तसेच, दोन्ही महामार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम पार पडली असली तरी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे नियमितपणे होणारी स्वच्छता सुरूच राहणार आहे.