मुंबई महानगरपालिकेने यंदा दिवाळीनिमित्त आठवडाभरासाठी सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी ही रोषणाई करण्यात येणार असून महानगरपालिका त्यासाठी तीन कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांना यासाठी १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

हेही वाचा- छटपुजेनिमित्त जुहू, सांताक्रुझ परिसरातील मद्यविक्री दुकाने बंद

मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे, वाहतूक बेटे, रस्ते, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी रोषणाई करून यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ही रोषणाई केवळ दिवाळीच्या आठवड्यासाठी असेल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तीन दिवस रोषणाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर दिवाळीसाठी रोषणाई करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत ही रोषणाई करण्यात येणार आहे.