मुंबई : इमारतींना निवासयोग्य दाखला जारी करताना महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून केवळ वास्तुरचनाकाराच्या अहवालावर अवलंबून न राहता दुय्यम अभियंत्याने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.

अपूर्ण इमारतीला ओसी

विलेपार्ले येथील सहजीव सहकारी गृहनिर्माण संस्थेला जानेवारी २०२५ मध्ये महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने निवासयोग्य दाखला दिला. परंतु आता सहा महिने होत आले तरी या इमारतीची कामे पूर्ण झालेली नसल्याचे आढळून आले. ही बाब तक्रारीद्वारे निदर्शनास आणली असता मुख्य अभियंता सुनील राठोड यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. वास्तुरचनाकाराने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे निवासयोग्य दाखला दिल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. परंतु या प्रकरणात वास्तुरचनाकाराचा अहवाल विसंगत असल्याचे पालिकेच्या तपासणीतही आढळून आले. त्यानंतर इमारत प्रस्ताव विभागाने संबंधित वास्तुरचनाकाराकडे स्पष्टीकरण मागविले आहे.

निवासयोग्य दाखला जारी करण्याबाबत महापालिकेने जुलै २०१७ मध्ये मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनानुसार, इमारतीला निवासयोग्य दाखला देताना ती इमारत संपूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात तसे आढळले नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मार्गदर्शक सूचना पुन्हा नव्याने जारी करून त्याची कठोर अंमलबजाणी करण्यास सांगण्यात येणार असल्याचे इमारत प्रस्ताव विभागाचे मुख्य अभियंता सुनील राठोड यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाडे रोखण्यासाठीच…

पुनर्विकास प्रकल्पात निवासयोग्य दाखला जारी केल्यानंतर विकासकांकडून तात्काळ भाडे थांबविले जाते. या भाड्यापोटी कोट्यवधी रुपयांची रक्कम विकासकांना खिशात घालता येते. त्यामुळे विकासकांकडून घाईने निवासयोग्य दाखला घेतला जात आहे. पालिकेकडूनही प्रत्यक्ष तपासणी न करता निवासयोग्य दाखला दिला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या इमारतीचे काम सुरु असतानाच एका कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू झाल्याने ही बाब अधोरेखित झाली. या प्रकरणी पालिकेच्या के-पश्चिम विभागाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने इमारत पूर्णत्वात त्रुटी असल्याचे पत्र २९ एप्रिल २०२५ रोजी इमारत प्रस्ताव (पश्चिम उपनगर) विभागाकडे दिल्यामुळे ही बाब अधिक स्पष्ट झाली. या पत्रातही मोठ्या प्रमाणात बांधकाम अपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले होते. पार्किंग टॉवर, गच्चीवरील उद्यान, मुख्य प्रवेश तसेच तळमजल्यावरील बरीच कामे अपूर्ण असून इमारतीची सद्यस्थिती राहण्यायोग्य नसल्याचेही त्यात नमूद होते.