मुंबई : पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीमध्येही विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशाला अल्प प्रतिसाद दिला आहे. पहिल्या फेरीमध्ये झालेल्या २२ टक्के प्रवेशानंतर आता दुसऱ्या फेरीमध्ये फक्त १८ टक्के प्रवेश झाले आहेत. मात्र पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये असलेल्या ‘चांगले महाविद्यालय’ (बेटरमेंट) या पर्यायामुळे विद्यार्थी तिसऱ्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अभियांत्रिकीच्या दुसऱ्या फेरीमध्ये १ लाख ८३ हजार ७६० जागांसाठी १ लाख ८९ हजार २७७ विद्यार्थांनी महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरला होता. त्यातील १ लाख ६२ हजार २०५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. तर १४ हजार १६ या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकाचे पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने त्यांचे प्रवेश आपोआप निश्चित झाले होते. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये अवघ्या २९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने पहिल्या तीन पसंतीच्या महाविद्यालयांव्यतिरिक्त महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवत ‘उत्तम महाविद्यालय’ या पर्यायाला पसंती दिली आहे. परिणामी दुसऱ्या फेरीमध्ये अवघ्या १८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

पहिल्या फेरीसाठी १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये १५ हजार ८५२ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र पहिल्या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांपैकी फक्त ३४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीमध्ये ३४ हजार ९३१, तर दुसऱ्या फेरीमध्ये २९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून ६४ हजार ८४१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत.

फेरीतील बदलाचा फारसा परिणाम नाही

अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक हाेते. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांना ‘उत्तम महाविद्यालय’ हा पर्याय उपलब्ध असल्याने दरवर्षी अखेरच्या फेरीपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेत नव्हते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास विलंब होत होता. हा प्रकार रोखण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने यंदा प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करून पहिल्या फेरीमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय, दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या तीन पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी त्याचा प्रवेशावर फारसा परिणाम झालेला नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.