मुंबई : मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी केली. अभिनेता डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कादपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले होते. डिनो शिवसेना(ठाकरे गट) युवानेते व आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.

याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. अभिनेता डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनो यांची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने आठ तास चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यांबाबत पुरावे म्हणून काही कागदपत्रे आणण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार बुधवारी ते कागदपत्रे घेऊन आले होते. याप्रकरणी अटक आरोपी केतन कदम व डिनो यांच्यात २०१९ व २०२२ या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. डिनो व सॅन्टिनो दोघेही सहा तासांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.

याप्रकरणातील आरोपी कदम न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेला त्यांच्या व्यवहारांबाबतची माहिती मिळाली होती. डिनो कदमला २५ वर्षांपासून ओळखतो. चौकशीसाठी डिनोचा भाऊ देखील उपस्थित होता. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर डिनो व त्याच्या भावाला पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे. मिठी कंत्राटाबाबत आर्थिक गुन्हे शाखेला काही कागदपत्रांची आवश्यकता होती. या प्रकरणातील काही कागदपत्रे महापालिकेकडे मागण्यात आली होती. त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी लेखापरिक्षणही करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑडिट फर्मशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी विविध कंत्राटदार व त्यांच्या संबंधीत बँक खाती यांची पडताळणी करायची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय?

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील वीस वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यातील अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंत्े प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंता गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच अॅक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाखांंचे नुकसान केल्याचा आरोप आहे.