ग्रामीण आणि अति दुर्गम भागातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धडे दिले जावेत तसेच त्यांना ज्ञानाचे भंडार उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. विद्यापीठाअंतर्गत असलेली ग्रामीण आणि दुर्गम भागातील महाविद्यालये आता उपग्रहाद्वारे जोडली जाणार असून विद्यापीठाच्या आभासी वर्गखोलीच्या माध्यमातून ही ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहचणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बठकीत या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.
विद्यापीठाच्या आभासी वर्गखोलीच्या माध्यमातून ही सुविधा डिजिटल स्वरुपात उपलब्ध होणार असून यामध्ये ग्रामीण भागातील महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाच्या आभासी वर्गखोलीशी जोडण्यात येणार आहे. यासाठी खास उपग्रहाच्या मदतीने दुहेरी संवादाची किमया साधणार असून या विद्यार्थ्यांना अत्यंत सुस्पष्ट चलचित्र आणि ध्वनी प्रक्षेपण उपलब्ध करुन दिले जाणार आहे. स्टुडिओमध्ये होणारे व्याख्यान तसेच जागतिक पातळीवरील ख्यातनाम वक्त्यांचे व्याख्यान या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजमीतीला भारतात उपग्रहाच्या माध्यमातून व्यावसायिक सिनेमा जवळपास ८५०० चित्रपट गृहात एकाच वेळी दाखवला जात आहे. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत कमी खर्चात ही महाविद्यालये जोडली जाणार आहेत. संवादाची ही प्रक्रिया दुहेरी स्वरुपाची असून यामध्ये विद्यार्थ्यांना व्याख्याताला थेट प्रश्न विचारता येणार आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा दुय्यम दर्जाची असल्यामुळे अनेकदा संकेतस्थळावरून व्याख्यान ऐकणे त्रासदायक होत होते. पण आता उपग्रह जोडणीमुळे हा त्रास जाणार असून महाविद्यालयांना विना अडथळा व्याख्याने ऐकण्यास मिळणार असल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लिलाधर बन्सोड यांनी दिली.